
दिनांक २ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
महाराष्ट्रात शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकचा समावेश असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. हा तांदूळ दररोज गोरगरीब जनता खात आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे तांदूळ एक प्रकारचे विष असून, त्याचे सेवन जनतेच्या जीवनासाठी घातक ठरू शकते. तसेच, या प्रकारामुळे शासनाच्या सशक्त भारत योजनेलाही फटका बसत आहे. त्यामुळे या बोगस तांदूळ विक्री तात्काळ थांबवून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात सांगितले की, प्लास्टिकयुक्त तांदूळ वितरण बंद करावे आणि सर्व दुकानदार व गोडाऊन यांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. या गंभीर विषयावर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे, तालुका कार्याध्यक्ष गोरख तात्या घोडके, तालुका उपाध्यक्ष रवींद्र महांडूळे, तालुका संघटक उत्तम घोगरे, तसेच आरडे मेजर, गणेश महंडुळे, रोहीदास गोसावी, सुहास होले आदींचा समावेश होता.
नायब तहसीलदार बन साहेब यांनी या विषयात तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तथापि, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी असा इशारा दिला की, “प्लास्टिकयुक्त तांदळाचा प्रकार अत्यंत गंभीर असून यासाठी उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल.”
स्रोत: (संभाजी ब्रिगेड निवेदन)






