दिनांक ११ जुलै २०२४ कोळगाव, श्रीगोंदा:
मुंगूसगाव जलजीवन योजनेअंतर्गत झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामांमध्ये पाईपलाईन, विहीर बांधकाम व टाकीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार मुंगूसगाव येथील युवा नेते सुजित इथापे यांनी केली आहे. गट विकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करूनही अद्याप कामाची पाहणी न झाल्याने सुजित इथापे व काही ग्रामस्थांनी या दर्जाहीन कामाबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुजित सुनील इथापे व इंद्रजीत बाबासाहेब कर्डिले यांनी मुंगूसगाव येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये ११ ऑगस्ट २०२३ रोजी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. त्यामध्ये मुंगूसगाव जलजीवन योजनेअंतर्गत संबंधित ठेकेदाराने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामध्ये जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे ती पुरेशा प्रमाणात खोलवर टाकलेली नसून एक ते दीड फूट उंचीवर खोदकाम करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहेत. तसेच या योजनेच्या कामासाठी विहिरीचे खोदकाम अंदाजपत्रकापेक्षा कमी करण्यात आले आहे. मुंगूसगाव येथील पाण्याच्या टाकीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे.
सुजित इथापे यांनी आरोप केला आहे की, पंचायत समिती, श्रीगोंदा यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही व गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी गणेश भोसले यांना पाहणी करण्याचा आदेश दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाचे कामकाज झाल्याने जलजीवन योजनेचा उद्देश सफल झाला नाही. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे व ठेकेदारांनी काम निकृष्ट केल्याने या पाणी योजनेच्या पाईपलाईन वारंवार फुटत आहेत.
सदर योजनेच्या कामाची तातडीने दखल घेऊन व पाहणी करून मुंगूसगावकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा, निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल लवकरच जन आंदोलन हाती घेऊन रस्ता रोको अथवा उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे सुजित इथापे यांनी सांगितले.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)






