दिनांक २३ जून,श्रीगोंदा:
कोरोना लॉकडाऊनचा मार तूर, कापसाचे शासनाने केलेले बेहाल, कागदावरच राहिलेली कर्जमाफी आणि पीक कर्ज मागणा-या शेतक-यांचा बँकामध्ये होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
तेंव्हा वेळ पडली तर कर्ज काढा. परंतु, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्या. तसेच या प्रश्नी बँकांच्या दारात उद्यापासून आमदार बबनराव पाचपुते यांचे मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घेऊन, आंदोलन करणार असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष सह भाजपा पदाधिकारी यांनी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.
यावेळी संदीप नागवडे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. सुहासिनी गांधी, गणेश झीटे, दीपक शिंदे, संतोष खेतमाळीस, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, अंबादास औटी, महावीर पटवा, राजेंद्र उकांडे, दीपक हिरणावळे सह उमेश बोरुडे उपस्थित होते.
कर्जमाफी आणि पीककर्ज या मुद्यावर दिनांक २२ जून २०२० रोजी भाजपाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, त्याच धर्तीवर शेतकी-यांच्या विविध प्रश्नावर श्रीगोंदा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी हे हि आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र,सहा महिने झाले अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत. काही शेतकी-यांची तर यादीत नावेच आलेली नाहीत. राज्यात कोरोनाचे संकट आहे. म्हणून, पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारचा बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा तर पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. राज्यात लाखाच्यावर शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.मजबुरीने शेतकऱ्यांना सदरचा पडून असलेला कापूस व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांकडे पडून असलेला हरभरा खराब होण्याची वेळ निर्माण झाली आहे. खरीप पीक कर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, हरभाऱ्याचे पैसे आलेले नाहीत, शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरीसाठी पैसा कसा उपलब्ध करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड कारणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोसाहन निधी देण्याची केलेली घोषणा हि हवेत विरते कि काय ? अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आज पर्यत कधीच झाली नाही. पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकामध्ये वारंवार अपमान व हेळसांड होत आहे.त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात असून,तो हवालदिल झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने २२ मे २०२० रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही. याची कबुली देऊन, शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले गेले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली.दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्यास प्रोसाहन अनुदानाचा आदेश आद्यप हि निघाला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या ‘कर्ज वितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशाऱ्यालाहि बँका जुमानत नाहीत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी कोरडवाहू २५ हजार, व फळबागांना रुपये ५० हजार केलेल्या घोषणेचे पुढे काय झाले ? का सरकार हे हि विसरले आहे ? या शेतकऱ्यांच्या प्रश्नी श्रीगोंदा तालुका भाजपा पदाधिकारी उद्या बुधवार दिनांक २४ जुन २०२० पासून काष्टी, लोणीव्यकनाथ तसेच कोळगाव येथील राष्ट्रीयकृत बँका समोर आंदोलन करणार आहेत.
(स्रोत:बबनराव पाचपुतेंचे माऊली संपर्क कार्यालय)
