दिनांक १० ऑगस्ट,श्रीगोंदा:
दिनांक २७ जुलै २० पासून गजानन खैरे सर यांनी मागील २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या हक्काच्या पगारासाठी औरंगाबाद ते मुंबई उपाशीपोटी पायी दिंडी काढली आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत नाजुक असून, त्यांच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी व त्यांचे प्राण वाचवावे अशा प्रकारचे निवेदन ‘मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स’ संघटनेचे नाशिक विभाग प्रमुख प्रा.नितिन झणझणे यांनी आज दिनांक १० ऑगस्ट रोजी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी (महाजन) यांना दिले.
प्रा. झणझणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या १५ दिवसांपासून खैरे सर उपाशीपोटी आंदोलन करीत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक अस्वस्थ झाले आहेत. शासनाने आंदोलकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. यांचबरोबर शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक स्तरावरील अघोषित कॉलेज घोषित करून त्यांच्या खात्यावर प्रचलीत नियमानुसार पगार जमा करावा यांसाठी ‘मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स’ संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे यात स्पष्ट केले आहे.
स्थानिक प्रशासनास निवेदन देतेवेळी मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स संघटनेचे (नाशिक विभाग प्रमुख) प्रा.नितिन झणझणे, (राज्य संघटक) प्रा.राहुल सोनवणे, (राज्य सल्लागार) प्रा.दादासाहेब गिरामकर, (राज्य प्रसिद्धी प्रमुख) प्रा.राम सोनवणे, (राज्य निरीक्षक) प्रा.पांडुरंग भोपळे, प्रा.योगेश गायकवाड, प्रा.सचिन आगळे, प्रा.अतुल सूर्यवंशी, प्रा.संजय लकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(तहसीलदार श्रीगोंदा यांना देण्यात आलेले निवेदन)
