जगात स्वतंत्र-सार्वभौम असे २३१ देश आहेत. त्यापैकी २०० देशांत ‘कोरोना महामारी’चा फेरा सुरू आहे. तथापि, एप्रिलपर्यंत सर्व देशांच्या विमानांच्या धावपट्ट्या खुल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ३१ देशांत ‘कोरोना’ गेलेलाच नाही,असे खात्रीने म्हणता येत नाही. प्लेग, कॉलरा, देवी, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, सार्स, मर्स, झिका हे संसर्गजन्य रोग आहेत. या रोगांच्या साथींनी आजवर कोट्यवधी माणसांचे बळी घेतलेत. पण ‘कोरोना’ने जेवढ्या कमी कालावधीत जगातील समस्त मनुष्य प्राण्याला ग्रासले, लोकांच्या मन आणि मेंदूचा कब्जा घेतला ; तशी वेळ पूर्वी कधी आली नव्हती.महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर, या बोगद्यात आपण आपले सहप्रवासी म्हणजे महानगरवासीय, जिल्हावासीय मानलेत.
‘कोरोना’बाधित रुग्ण आपल्या गावात, गल्लीत, परिसरात आढळल्यास आपण आपल्या कुटुंबापुरते मर्यादित झालो आहोत.संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहता, जोवर अशा आजारावर प्रतिबंध करणारी औषधं अथवा लस येत नाही; तोवर त्या रोगाची लागण होणार नाही,याबाबत आवश्यक ती काळजी कठोरपणे घ्यावीच लागेल. असे होत नाही,तोपर्यंत ‘कोरोना’रूपी दहशत लोकांवरचा आणि व्यवस्थेवरचा आपला ताबा, नियंत्रण अजिबात कमी होऊन देणार नाही. यावरची लस जेव्हा तयार होईल, तेव्हा ती लस त्वरित सर्वांपर्यंत पोहोचणार नाही. ती सर्वत्र पोहोचेपर्यंत ‘कोरोना’चे अस्तित्व जाणवत राहील.
येत्या काही दिवसांत ‘कोरोना’ प्रतिबंधक व रोगप्रतिकारक औषधे विकसित होतील असे मानून तसे झाल्यास, या महामारीचे आणि ‘लॉकडाऊन’चे वर्तमान- भविष्य काय असेल? या प्रश्नाचे उत्तर चीनमधील ‘वुहान’ या शहरातून मिळते. इथेच ‘कोरोना’ने आपली जीवघेणी दहशत सर्वप्रथम दाखवायला सुरुवात केली. हेच जगातलं पहिलं ‘लॉकडाऊन’ शहर ! तिथल्या प्रशासनाने कठोरपणे संचारबंदी आणि आरोग्य व्यवस्था राबवून ‘कोरोना’ प्रसार रोखलाय. परिणामी, वुहान शहराचा ‘लॉकडाऊन’ ७६ दिवसांनी ४ एप्रिलला उठवण्यात आला.म्हणजेच सध्या तरी स्वतःची काळजी स्वतः घेऊन घरात राहणे हा स्वतःपुरता आणि लॉक डाऊन हाच उपाय सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
१९५० च्या दशकानंतर तब्बल ४५ वर्षांनंतर १९९४ साली सुरतमध्ये प्लेगच्या आजाराने असेच आपले अस्तित्व दाखविले होते. या विषाणू पासून मुक्तता पूजा-अर्चा करून, कुलदैवताचे नामस्मरण करून वा गाऱ्हाणी- नवस बोलून होणार नाही.’विज्ञान संपतं, तिथे अध्यात्म सुरू होतं,’ अशा बाता मारणारे, लोकांना प्रगतीपासून दूर नेणारे, त्यांची बुद्धी नासवणारे परमपूज्य- बुवा – बापू – स्वामी – माता- मठाधिपती – हभप आदि थापाडे सध्या ‘संचारबंदीत’ आहेत. म्हणून, भक्तांच्या पाद्यपूजेतून वाचलेत.
सरकारने दुकानांप्रमाणेच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे-देवळे यांना एकाच आदेशानुसार टाळी ठोकून दुकाने आणि देवळे एकाच लायकीची असल्याचे दाखवून दिलेय. देवखाने बंद आणि दवाखाने चालू’ हेच जीवनाचे सत्य आहे.हे सर्वांनी याच देही याची डोळा पाहिले आहे.त्यामुळे यापुढे फुकटचा प्रसाद-भंडारा हादडण्यापेक्षा उत्तम प्रतिच्या वैद्यकीय सेवा-सुविधा मोफत कशा मिळतील. यासाठी सरकारकडे आग्रह धरून देवखान्यांचे मंदिरांचे रूपांतर दवाखान्यांत करून डॉक्टरांना आणि लोक रस्त्यावर येऊ नयेत.म्हणून, पोलिसांना, सहकार्य करणे खूप गरजेचे आहे.
आता पोलिसांना सहकार्य करायचे म्हणजे नेमकं काय रोल काय असावा आपला??
देशपातळीवर संचार बंदी जाहीर झाले आणि लोकांच्या भविष्याच्या, जगण्याच्या, पोटा पाण्याच्या प्रश्न उभा राहिला.अनेक कुटुंबं, भीतीने घरापासून दूर महाराष्ट्रात वा परराज्यात कामासाठी राहत असलेले मजूर पायी चालत आपापल्या गावी जायला निघाले. या सर्व लोकांना आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचविण्याचा संविधानिक अधिकार आहे. या मजुरांना भारत सरकारने विमानाद्वारे त्यांच्या घरी पोहोचवावे, अशी तर अपेक्षा जन्मात कधीच नव्हती. पण, त्यांच्यासाठी व अशा अनेकांसाठी प्राथमिक सेवा, व्यवस्था तरी करायला हव्या होत्या असे मनोमन वाटते.
लॉकडाऊन सारख्या गंभीर परिस्थितीत हा पायी प्रवास त्यांच्यासाठी किती भयंकर होता? ही कल्पनाच अंगावर काटा आणते, याच काळात नव्हे मी तर म्हणेन कुठल्याही काळात कुणावरही अशी वेळ येणं म्हणजे वाईटच. हा प्रवास नक्की त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेला? की, अर्ध्यावर हेही माहित नाही. पुढच्या क्षणाची शाश्वती नसलेले हे लोक परिवार फक्त हातात मावेल इतकं सामान घेऊन लांबच्या प्रवासाला निघाले होते. कडेवर, खांद्यावर लहान मुले, सोबत स्त्रिया आणि अनिश्चित लांबीचा अकलनिय प्रवास. या दरम्यान त्यांना काय काय अडचणी आल्या असतील ? याची फक्त कल्पनाचं.
लोकं अनेक युक्त्या करून जिथे आहेत तिथून, जिथे जायचं आहे तिथे, जाण्यासाठी मरणाची जोखीम पत्करून हरेक प्रकारे प्रयत्न करत होते. क्षमतेपेक्षा जास्त लोकं कोंबून रखरखत्या उन्हात झाकणं बंद करून दुधाच्या टँकरच्या टाकी मध्ये, मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये तापलेल्या आवरणासह दरवाजे बंद करून, अनेक वाहनांमधून लोक मरणाच्या भीतीने जगण्याचा प्रवास करीत होते ; यातील कोण जाणे एखादा कोरोनाग्रस्त आहे की नाही ? हे ही कुणाला माहिती नव्हते. त्यामुळे कदाचित त्यांची ही जोखीम त्यांना,त्यांच्या कुटुंबाला, सहप्रवाशांना,समाजाला आणि परिणामी देशाला किती मोठे परिणाम भोगायला लावू शकली असती ? याची त्यांना कल्पना न केलेलीच बरी.
सुदैवाने तसे काही घडले नाही. परंतु, या काळामध्ये पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली अन्यथा ही सैरावैरा पळणारे लोक, गावाकडे जाणारे जत्थे म्हणजे, विषाणूचा सर्वात मोठा वाहक (carier)ठरले असते. खेड्यापाड्यांमध्ये या विषाणूंचा प्रसार न रोखन्या इतपत झाला असता.हे त्यांच्या त्यांच्या प्रांतांमध्ये राज्यांमध्ये परतलेले ही लोकं पुन्हा हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली की, पुन्हा कामधंद्याच्या शोधात शहराकडे कूच करू लागतील.त्यावेळेसही त्यांच्या नियोजनाचा मोठा ताण पोलीस प्रशासनावर पडणार आहे.
करोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, देशात साथरोगनियंत्रण अधिनियम १८९७ कायद्यांतर्गत
(Epidemic diseases act, 1897) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एखाद्या रोगाला आळा घालण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असतील, तर हा कायदा लागू करण्याची तरतूद आहे. राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम, १८९७ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. १४४ (१) चा वापर करण्यात येत आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यातही साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकचं सध्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. गर्दी वाढू लागली, तसा पोलिसांचा ताणही वाढला आहे.हातात काठी घेऊन हा अवलिया कर्तव्याशी उभा ठाकला आहे. पोलीस प्रशासन अधिकारी तुमच्या-आमच्या जगण्याची ससेहोलपट होऊ नये म्हणुन, सुरक्षिततेच्या साधनाशीवाय फक्त हातामध्ये सैनीटायझर, तोंडाला मास्क लावून आणि कोणीही घराबाहेर पडू नका अशी आवाहन करत युद्धपातळीवर करत आहे.
“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” करण्यास कटीबध्द असलेली १० पोलिस आयुक्तायलये, ३६ जिल्हा पोलिस दले, व जवळ-जवळ २ लाखाच्या आसपास मनुष्यबळ असलेली ही संस्था, माफ करा संस्था नव्हे “परीवारच” दुसऱ्या परिवारांसाठी एवेंजर म्हणून, रस्त्यावर उभी आहे. कामाचा ताण, अनियमीत कर्तव्याचा कालावधी, सण-उत्सवाला सुट्ट्यांची वण-वण, न मिळणाऱ्या रजा, Family problem’s, दुर असल्यामुळे परीवाराकडे होत असलेलं दुर्लक्ष, कर्तव्याच्या आड या सर्व गोष्टींची सवय करता-करता सजीव दिसणारा हा माणुस स्वतःच्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र सतत भावनांना मुरड घालतो.
लोकांच्या सुरक्षिततेसाठी घरातील सण-उत्सव मुलाबाळांचा, पत्नीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस सुद्धा बाजूला ठेवून, स्वतःच्या, कुटुंबाच्या स्वतःच्या भावनांना मुरड घालत, स्वभावनांच्या बाबतीत पुर्णपणे निर्जीव पाषाण होतो. हे करत असतांना समाजासाठी मात्र, एक सुरक्षिततेचा विश्वासाचा निखळ झरा याचातून पाझरताना दिसतो.
खाकी वर्दीतला हा पांडुरंग कमरेवर हात ठेवून, निर्भीडपणे “duty करतो आहे.
त्यांच्यामुळे सुव्यवस्था अबाधित राखून अन राहुन डॉक्टरांच बरच काम हलकं झाल आहे. जर covid यंत्रणेतून पोलीस वजा केला असता ? डॉक्टर आणि सध्याच्या दवाखान्यांची अवस्था काय राहिली असती ? कल्पना न केलेलीच बरी.ही ताकत आहे पोलिसांची, त्यांना बहाल केलेल्या संविधानिक अधिकाराची त्या अधिकाऱ्याला अनुसरून विविध कलमांची अर्थात परिपूर्ण अशा भारतीय राज्यघटनेची. कारण १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात प्रधानमंत्री ४० दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करू शकतात. पूर्ण अधिकार पोलिसांना बहाल करू शकतात. पण ३४, कोटीच्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र, ते करु शकत नाहित.एका दिवसात २००० च्या पुढे लोक दगावले गेले, संपूर्ण अमेरिकेत हाहाकार आहे. तरीही राष्ट्रध्यक्षाला तिथे “लॉकडाऊन” जाहीर करन्यात अडचणी आहेत. इथे भारतात प्रधानमंत्री मात्र, लॉकडाऊन जाहीर करतात आणि अवघ्या देशात काही तासात शुकशुकाट होतो.जगाला आश्चर्य वाटत राहाते. ही ताकद आहे भारतीय राज्यघटनेची.. ही लवचिकता आहे भारतीय संविधानाची.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाबद्दल ज्येष्ठ अमेरिकन संपादक,अभ्यासक फरीद झकारिया व जगातील इतर संविधान विश्लेषक तज्ञ म्हणताहेत. “Modi could impose lockdown, Trump doesn’t have that power.” (भारताच्या राज्यघटनेत लिखित केल्याप्रमाणे केंद्राकडे ती शक्ती आहे. जी अमेरिकेत नाही’ भारतात ‘फेडरल’ व्यवस्था असली, तरी भारत हे ‘युनियन’ आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थितही होत नाही.
अमेरिकेत मात्र ५० स्वायत्त राज्ये आहेत. नागरीकांना दुहेरी नागरीकत्व आहे,त्यामुळे अमेरीकन अध्यक्षांना या राज्यांना डावलून,असे निर्णय घेता येत नाहीत. डॉ आंबेडकरांनी जाणीवपूर्वक ‘संघराज्य’ हा शब्द राज्यघटनेत वापरला. अमेरिकेमध्ये प्रथम राज्ये आणि मग ही राज्ये एकत्र येऊन देश स्थापन झाला.भारतात मात्र, आधी देश आकाराला आला आणि मग प्रांतरचना झाली. नेशन फर्स्ट! (Nation First) ही शक्ती येथील संविधानाने घट्ट केली,आणि ही संविधानिक शक्तीच प्रधानमंत्री यांना असे आणीबाणीच्या आणि संचार बंदीचा अधिकार बहाल करते. ज्यामुळे आजही आपला देश जगासमोर एक आश्चर्य बनुन उभा आहे..
सध्या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर सोबतच पोलीस सुद्धा रस्त्यावर डोळ्यात तेल घालून उभे आहेत. ‘कलम ३६०’नुसार आपल्याकडे अजूनही आर्थिक आणीबाणी नाही. शेतकरी आपले उत्पादन घेऊ शकतात; विकू शकतात. तेव्हा राज्यघटनेच्या चौकटीत राहून नियम पाळत डॉक्टर आणि पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करूयात.मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय नागरिक या बाबासाहेंबांच्या तत्वानुसार नेशन फर्स्ट प्राधान्य देऊन या संकटाला परतून लावूयात.
स्रोत:(सत्यशोधक प्रा.विक्रम कांबळे,कर्जत ९४२००३०२०३)
