दिनांक २४ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
मांडवगण येथील श्रीगोंदा विधानसभा समन्वयक (शिवसेना) अमोल बोरुडे यांनी सध्या महिलांवरील आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी स्पष्टपणे विचारले की, “मंत्र्यांची अब्रू कोणी लुटणार आहे का? मग त्यांना एवढा मोठा पोलिस ताफा आणि इंधनाचा खर्च का केला जातो?” आजच्या काळात महाराष्ट्रातील महिलांना आणि विद्यार्थिनींना खरी सुरक्षा देण्याची गरज आहे, आणि म्हणूनच यांची सुरक्षा यंत्रणा मंत्र्यांपासून काढून शाळा, महाविद्यालये, लेडीज हॉस्टेल्स, आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिस तैनात करण्याची गरज आहे.
बोरुडे यांनी असेही म्हटले की, विनाकारण पोलिस बलाचा वापर नको त्या ठिकाणी केला जात आहे. निर्भया स्कॉड सध्या कार्यरत आहे, पण त्यामध्ये अधिक बळकटीची गरज आहे. पोलिसांनी शाळा-महाविद्यालयात जाऊन संकटाच्या वेळी काय करावे याबद्दल अवेअरनेस सेमिनार आयोजित करणे गरजेचे आहे.
श्रीगोंदा तालुक्यात शिक्षण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. १५ दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थिनींनी हजारोंच्या संख्येने श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पी.आय. भोसले यांची अचानक बदली झाली. आता नवीन पोलिस निरीक्षकांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
अशा परिस्थितीत टवाळखोर देखील टोळीने रस्त्यावर आणि बसस्थानकाजवळ बसलेले दिसून येतात. श्रीगोंदा बसस्थानकाचे सेक्युरिटी गार्ड केबिनमध्ये बसतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यांचे काम बसस्थानकात लक्ष ठेवणे आहे, पण ते आत बसून राहतात. बसस्थानकासह शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कॉलेज आणि शाळेच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलिसांनी पेट्रोलिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. असे दिसून येत आहे की या टवाळखोरांना काही राजकीय आधारही मिळत आहे. पोलिस प्रशासनाने अशा राजकीय आधारस्तंभांना नागडं करून त्यांच्यावर कारवाई करावी. अत्याचार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.S
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





