दिनांक ४ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा-काष्टी रोडवरील हॉटेल वैष्णवी व हॉटेल अनन्या दरम्यान आज दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात मोटरसायकलस्वार बळीराम राऊत (वय ३३, रा. कानडी, तालुका केज) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताचा घटनाक्रम असा की, बळीराम राऊत हे पुण्यात काम करत होते व आपल्या पत्नीसह व मुलांना पुण्यातून एसटीने पाठवून स्वत: मोटरसायकलवरून आपल्या गावी कानडी (तालुका केज) चालले होते. श्रीगोंदा शहराजवळ आले असताना, हॉटेल वैष्णवी आणि हॉटेल अनन्या यांच्या दरम्यान त्यांच्या मोटरसायकलचा तोल गेला आणि ती रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या दुर्घटनेत बळीराम यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत अपघाताचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाचे शवविच्छेदन श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, मृतदेह त्यांचे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्रोत:(फिर्याद)





जाहिरात…


जाहिरात..
