दिनांक २ जुलै २०२४, श्रीगोंदा:
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी या नव्या उपक्रमाची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून श्रीगोंदा येथे शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी विद्यापीठ व शासनामार्फत झाली असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू करण्यास शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. हे विधी महाविद्यालय तीन वर्षांचा कोर्स असून प्रवेश क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर सीईटी परीक्षा दिल्यानंतर या कोर्ससाठी पात्र ठरू शकतो.
श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायदेविषयक शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना न्यायिक प्रणालीची प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.
नागवडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सोनिया गांधी पॉलीटेक्निक इंग्लिश मीडियम स्कूल, बी. एड्. कॉलेज, बेलवंडी शुगर येथील राज्यातील पहिले ग्रामीण पॉलिटेक्निक आणि वीस माध्यमिक विद्यालयांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास ए प्लस मानांकन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा प्रथम क्रमांकाचा करिअर कट्टा पुरस्कार मिळाला आहे.
राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मान्यतेमुळे सर्व स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत असून, अनेक मान्यवरांनी नागवडे यांचे अभिनंदन केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




