दिनांक १० डिसेंबर,श्रीगोंदा:
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा मध्ये दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी अपघातामध्ये जखमी झालेल्या बालकामगाराचा पुणे येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचे समजल्याने कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होवून कुटुंबास नुकसानभरपाई मिळणेबाबत कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य आणि मा.साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी तक्रार केली होती.

आपले सरकार पोर्टलवर देखील, Grievance Token No. Dept/IELL/२०२०/५४२३ नुसार देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरील तक्रार अर्जाची दखल घेऊन महाराष्ट्र शासन अवर सचिव यांनी आयुक्त (कामगार), कामगार आयुक्तालय आणि संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना उपरोक्त तक्रार अर्जातील विषय आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करुन, संबंधित अर्जदारास अवगत करावे. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास त्वरीत सादर करावा असे कळवले आहे. तसेच, श्रीगोंदा येथील सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात दिनांक १७ : ११: २०२० रोजी झालेल्या अपघातामध्ये एका बालकामगाराचा मृत्यू झाल्यामुळे कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करुन, मृत बालकामगाराच्या वारसास नुकसान भरपाई देण्याबाबत विनंती केलेली आहे.
टिळक भोस यांना यापुढील पत्रव्यवहार हा कामगार आयुक्त कार्यालयाशी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाशी करण्यात यावा असे सुचवले आहे. मात्र, कामगार आयुक्त कार्यालय व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी लवकरात लवकर तक्रारीची दखल घेऊन, साखर कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करुन, मृत बालकामगाराच्या वारसास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी यावेळी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागवडे करखाण्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत.
स्रोत:(टिळक भोस, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड अहमदनगर)
