दिनांक १२ जानेवारी, श्रीगोंदा:
कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत श्रीगोंदा तालुक्यातील अनिल घनवट यांना समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. विशेषतः संबंध महाराष्ट्रातुन अनिल घनवट हे एकमेव व्यक्ती समीक्षक म्हणून निवडण्यात आले आहेत.

या समितीत (भारतीय किसान यूनियनचे नेते) भूपिंदर सिंह मान, (आंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे) डॉ. प्रमोदकुमार जोशी, (कृषी अर्थतज्ज्ञ) अशोक गुलाटी आणि (शेतकरी संघटनेचे नेते) अनिल घनवट यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या समितीतील दोन्ही शेतकरी नेते हे कृषी कायद्याचे समर्थक असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तर, शेतकरी नेते अनिल घनवट यांनी कालच नांदेड येथील एका कार्यक्रमात कृषी कायद्याला पाठिंबा दिला होता. या कायद्यात थोडाफार बदल करून, हा लागू करणे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच, कायद्याला समर्थन असले तरी, सरकारला आमचा बिलकूल पाठिंबा नाही ! असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे चार सदस्यांच्या समितीत कृषी कायद्यांचे दोन समर्थक असल्याने ही समिती निष्पक्षपाती चौकशी कशी करेल? असा सवालही केला जात आहे.
स्रोत:(टीव्ही नाईन महाराष्ट्र)
