श्रीगोंदा तालुक्यात धाडसी चोरी: चिखलीतील कृषी दुकानातून साडेसहा लाखांचा माल लंपास..

बेलवंडी, ता. ८ जून २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावातील बसस्थानकाजवळील रामेश्वर ऍग्रो मॉल अँड ऍग्री बिझनेस सेंटर या कृषी दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल ₹६,४२,००० किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली. आज, ८ जून रोजी रात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास ही धाडसी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

दुकान मालक सागर मच्छिंद्र झेंडे (रा. वडाचीवाडी, चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, चोरट्यांनी दुकानाच्या पत्र्याचे नट-बोल्ट उघडून प्रवेश करत,

  • पंचगंगा कंपनीचे कांद्याचे बियाण्याचे ८ बॉक्स (₹३.८४ लाख)
  • महागुजरात कंपनीचे कांद्याचे बियाण्याचे ८ बॉक्स (₹४८,००० प्रत्येकी)
  • परिफ्लेक्स कंपनीचे कीटकनाशके, तणनाशके व टॉनिक (₹२ लाख)
  • एचपी कंपनीचा सीपीयू (₹१०,०००)
    असा एकूण ₹६,४२,००० रुपयांचा माल चोरून नेला.

गावाच्या मध्यवस्तीतील ठिकाणी एवढी मोठी चोरी झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकरी पेरणीसाठी सज्ज झालेले असताना, कृषी दुकानातील बी-बियाणे आणि औषधांची चोरी झाल्यामुळे कृषी व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या घटनेने कृषी व्यवसायिकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading