श्रीगोंदा, दिनांक ७ एप्रिल २०२५:

श्रीगोंदा शहरात रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, या बाबतीत बहुजन मुक्ती पार्टीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देखील होती. परंतु, डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला असून त्यांनी स्पष्टपणे हिंदू देव-देवतांना मान्य न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी समाज बांधवांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांमधूनही हे स्पष्ट केले होते.

यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी राहुल छत्तीसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे रामनवमीसारख्या हिंदू सणाच्या मिरवणुकीचा भाग कधीच नसतील. त्यांच्या प्रतिमेचा अशा प्रकारच्या मिरवणुकीत वापर होणे ही बाब बौद्ध समाजाच्या श्रद्धेला ठेस पोहोचवणारी आहे. ही गोष्ट जाणूनबुजून करण्यात आली की अज्ञानातून, हे स्पष्ट व्हावे यासाठी आम्ही प्रशासनाकडे लेखी तक्रार करणार आहोत.”

दरम्यान, मिरवणूक आयोजकांनी या बाबतीत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

या प्रकारामुळे धार्मिक समतेच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, मिरवणुकीत कोणत्या प्रतिमा वापरण्याचा अधिकार कुणाला आणि कोणत्या हेतूने..? याविषयी जनजागृतीची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)


