तुकाराम ते साहित्यसम्राट
शाळेत जावुन डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक बनता येते हे आम्ही आजपर्यंत ऐकत आलोय. पण, शाळेत न जाता साहित्यसम्राट बनता येते..! ते जगाला दाखवून देणारे रत्न याच महाराष्ट्रभूमीत जन्मले.
ज्यांनी दिड दिवस शाळेत जावून जीवनात एकूण ३५ कादंबर्या लिहल्या. अनेक लघुकथा व पोवाडे रचुन अन्यायी समाजव्यवस्था विरोधात आपल्या लेखणीद्वारे जोरदार प्रहार केला. त्या महान क्रांतीविराचे नाव होते साहित्यसम्राट, लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे …

आज (१ ऑगस्ट) अण्णाभाऊची जयंती त्यानिमित्त त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन.
१ ऑगस्ट १९२० साली वाटेगाव येथे अण्णांचा जन्म मातंग कुटुबांत झाला. अस्पृश्य असल्याने बालपणापासूनच अण्णांना जातीव्यवस्थचे चटके जाणवू लागले. अस्पृश्य लोकांना त्या काळी अनेक हक्कांपासून वंचित राहावे लागत होते.
उच्चवर्णीय लोक अस्पृश्य लोकांवर अन्याय जुलूम करत असे. बालपणी तुकाराम असलेले अण्णा भविष्यात साहित्यसम्राट बनून समाजातील जातीभेद विरोधात लढा देतील असे कोणालाच वाटले नाही.

तुकाराम ते साहित्यसम्राट हा अण्णाभाऊचा प्रवास सोपा नव्हता. जातीभेदामुळे तुकाराम शाळेत फक्त दिड दिवस गेले. अण्णांनी रागाने शाळेवर जोरात दगड भिरकवला. अण्णांनी फेकलेला हा दगड म्हणजे अन्यायी समाजव्यवस्थवर व जातीभेदावर फेकलेला दगड होता. अण्णांनी लेखणीद्वारे जातीभेदावर कडाडून हल्ला केला. शाळा सोडली पण मनात शिकण्याची जिद्द होती. मग अण्णा शाळेबाहेर राहुन कागदावर अक्षर गिरवू लागले. मुंबईस मिलमध्ये मजूर म्हणून अण्णा काम करू लागले.

अस्पृश्यावरील अन्याय दूर करण्यासाठी व हक्कांसाठी अण्णा लढा देऊ लागले. कामगार म्हणून काम करताना कामगाराच्या व्यस्था समजून घेवुन कामगारांच्या हक्कासाठी अण्णा लढले. अण्णांनी अनेक पोवाडे, लोकनाट्य, कादंबर्या लिहत समाजातील अन्यायकारक रुढी, परंपरा, जातीभेद विरोधात लढा दिला.

अण्णांनी स्टँलीनचा पोवाडा गायला. रशियात शिवछत्रपतींचा पोवाडा गायला. वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंब-या अण्णांनी लिहल्या. फकिरा कादंबरीस राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला. अण्णा म्हणत “पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती कामगार, दलित लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”.

अण्णांचे सहित्य अजरामर झाले. त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली अर्पण करताना अण्णानी गायलेली कविता “जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव” अजरामर झाली. अण्णांचे विचार नेहमीच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतील. अण्णांनी पेटवलेली हि समतेची, ममतेची मशाल नेहमीच तेवत ठेवूया.
लेखक-प्रा.महेंद्र मिसाळ (वक्ते व लेखक) ९८५०३९२४१४
