दिनांक २८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील प्रख्यात राजकीय नेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री घनश्याम अण्णा शेलार यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करून श्रीगोंदा विधानसभा २२६ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी विनोद सिंग परदेशी आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, ज्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.
आघाडीतील काँग्रेस नेते असलेल्या शेलार यांच्या या निर्णायक निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे दिसून येत आहे. आघाडीतील इतर घटक पक्ष आणि त्यांच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत मतविभाजन आणि राजकीय स्थित्यंतर घडण्याची शक्यता आहे.
आघाडीच्या गटबंधनातील प्रमुख घटक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस आय या प्रमुख पक्षांमध्येही उत्सुकता आणि प्रतिस्पर्धी वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना उबाठा तर्फे सौ अनुराधा नागवडे यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अधिकृत तिकीट जाहीर करण्यात आले असून, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज एबी फॉर्मसह दाखल केला आहे.
तसेच आमदारकीच्या इच्छुक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे राहुल जगताप यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा झालेली असली तरी संपूर्ण चित्र अजून स्पष्ट नाही.
घनश्याम अण्णा शेलार यांनी बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आगामी निवडणुकीत राजकीय समीकरण आणखीनच रोमांचक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
स्रोत:(अधीकृत माहिती)




