दिनांक १३ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथील संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांच्या ‘वारकरी कृपा’ या नवीन घराचा गृहप्रवेश सत्यशोधक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

या गृहप्रवेश सोहळ्यात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, संत व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. आई-वडिलांचा सन्मान करून सत्यशोधक पद्धतीने पूजा मांडण्यात आली.

यावेळी भिमराव कोथिंबिरे, व्याख्याते सचिन झगडे सर, गदादे महाराज (कर्जत) व रेवन घोडके (श्रीगोंदा) यांच्या उपस्थितीत विधी पार पडला. व्याख्याते सचिन झगडे यांनी सत्यशोधक चळवळीचे महत्त्व आणि आजच्या काळातील गरज या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

या सोहळ्याला माजी मंत्री बबनदादा पाचपुते, घनश्याम अण्णा शेलार, अण्णासाहेब शेलार, माजी पोलीस उपायुक्त कांतीलाल कोथिंबिरे साहेब, ज्येष्ठ पत्रकार आरिफ भाई शेख, बाळासाहेब बळे सर, माजी नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत, मदन बिसूकर्मा या गरीब कुटुंबातील किडनी रुग्णासाठी आर्थिक मदत करण्यात आली. “कोणताही मुहूर्त न पाहता संत आणि महापुरुषांचे जन्मदिवस हेच आमचे सण,” असे मत नाना शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

सामाजिक बांधिलकी आणि सत्यशोधक विचारधारेचा आदर्श ठेवत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
