दिनांक १९ जुलै २०२६,श्रीगोंदा:
मुळशी येथील १ कोटी रुपयांच्या गाजलेल्या लाच प्रकरणात अडकलेले आणि सध्या श्रीगोंदा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले सचिन डोंगरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत संवाद साधतानाच, चक्क “मी भारताचे संविधान मानत नाही,” असे धक्कादायक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि तहसीलदारांच्या तातडीने बदलीच्या मागणीसाठी पीडित सामाजिक कार्यकर्ते आदेश शेंडगे यांनी मंगळवारपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ पुकारनार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते आदेश शेंडगे हे आपल्या कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार सचिन डोंगरे यांनी त्यांना उद्धट वागणूक देत काम टाळले. यावर शेंडगे यांनी, “मी भारताचा नागरिक आहे आणि या देशाचे संविधान मानतो, त्या अधिकाराने मी येथे आलो आहे,” असे सुनावले. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना तहसीलदार डोंगरे यांनी, “मी भारताचे संविधान मानत नाही,” असे सलग तीन वेळा विधान केले. ही बाब उपस्थित पत्रकार अमोल झेंडे आणि कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होती.
एका जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानाचा केलेला अवमान पाहून सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तहसीलदार सचिन डोंगरे यांचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे. यापूर्वी मुळशीचे तहसीलदार असताना त्यांना १ कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले होते. आता पुन्हा एकदा श्रीगोंद्यात त्यांचे संविधानाविषयीचे वादग्रस्त विधान समोर आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले जाणार असून, जोपर्यंत तहसीलदार सचिन डोंगरे यांची येथून हकालपट्टी किंवा बदली होत नाही, तोपर्यंत आपण उपोषणावरून उठणार नाही, असा ठाम पवित्रा आदेश शेंडगे यांनी घेतला आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
