आरक्षणाचे वास्तव व मानसिकता
औरंगाबादहून घरी आल्यावर डॉक्टर होण्यासाठी मला पुढील पाच – सहा वर्ष मुंबईला राहावं लागणार असल्याचं मी आईला सांगितलं. माझ्या बाहेर राहण्याची आता आईलाही सवय झालेली होती. त्यामुळे केवळ ‘ठिक आहे’, असं म्हणून ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. पण मी ओळखलं, की तिच्या मनात आता विचारांचं काहूर उठलं आहे. माझं बारावीपर्यंतचं शिक्षण ‘नवोदय’मध्ये झालेलं असल्याने माझा खर्च फारसा काही नव्हताच. पण आता उच्चशिक्षण घ्यायचं होतं व ते मोफत होणार नव्हतं. शिवाय ते शिक्षण मला मुंबईसारख्या अनोळखी व महागड्या शहरात घ्यायचं होतं.

शेठ जी. एस. कॉलेज हे शासकीय असलं तरी पुस्तक, फी, राहणं – खाणं या गोष्टींचा खर्च तर येणारच होता. आणि तो टाळताही येण्यासारखा नव्हता. या सर्वांची सोय कशी होणार? याच विवंचनेत आई होती. आणि त्याच वेळी भाऊचंही डी. एड. सुरू होतं. घरखर्च अजूनही दारू व्यवसायावर चालत असे. आणि आई मुकादमाच्या व्यवसायात जे थोडेफार पैसे मिळवायची ते तिने बँकेत जमा केले होते. त्यामुळे थोडी शिल्लक तर होती, पण ती पुरेशी नव्हती. आपल्या पुढील शिक्षणाला पैशांची अडचण येईल याची मलाही कल्पना होतीच. म्हणूनच मी आमच्या आदिवासी महामंडळाला भेट द्यायचं ठरवलं. सरकार तर्फे आदिवासींसाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. त्या योजनांमधून काही मदत मिळते का म्हणून मी आदिवासी महामंडळाच्या पिंपळनेर येथील केंद्रात जाऊन तेथील अधिकाऱ्याला भेटलो. मी वर्तमानपत्रातून आदिवासींसाठीच्या विविध शैक्षणिक योजनांबद्दल वाचत असे. त्यावेळी आदिवासी मुलींना हवाई सुंदरी बनविण्याच्या एका योजनेविषयी मी खूप वाचलं व ऐकलं होतं. मी विचार केला, की आदिवासी मुलींना एअर होस्टेस बनविण्यासाठी जर सरकार लाखो रुपये खर्च करत असेल, तर माझ्यासारख्या डॉक्टर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही सरकारकडे काहीतरी योजना असतीलच. शिवाय एअर होस्टेसचा समाजाला काहीच फायदा नसतो. पण एक आदिवासी डॉक्टर मात्र आदिवासी समाजाला मुळापासूनच बदलू शकतो. त्यांना केवळ औषधोपचारच नव्हे; तर नवा दृष्टिकोन देऊ शकतो.
त्यामुळे आदिवासी महामंडळ आपल्याला नक्कीच मदत करेल, हा ठाम विश्वास घेऊनच मी महामंडळातील अधिकाऱ्यांना नम्रपूर्वक माझा अर्ज दिला. त्यांनीही मला मदत करण्याचं आश्वासन देत एक पत्र दिलं व नंदुरबारला आदिवासी विकासमंत्री होते, त्यांच्या कार्यालयात जाऊन मला भेटायला सांगितलं. त्या कार्यालयात मला माझी बाजू छानच मांडता यावी म्हणून, मी त्यांनी दिलेल्या पत्रासोबत माझी बारावी व ‘सीईटी’चे मार्कशिटही जोडले. कार्यालयात भेटीला जाताना मी बसमध्ये बसून काय व कसं बोलायचं, याची मनातल्या मनात तयारी करत होतो. मला विश्वास होता, की त्या कार्यालयातील लोकांना माझी तळमळ व गुणवत्ता बघून माझ्याबद्दल अभिमान वाटेल. पात्रता बघून ते स्वत: हून आदिवासी कोट्यातून एखाद्या योजनेच्या माध्यमाने माझी मदत करतील. हे सर्व विचार डोक्यात घेऊनच मी ते कार्यालय गाठलं. पण तिथे गेल्यानंतर कळलं, की मंत्री महोदय मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांची भेट होणं शक्य नाही. मी खूपच निराश झालो. माझं अंदाजपत्रकच कोसळलं होतं. शेवटी मी ठरविलं, की आता थेट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर मुंबईतच त्यांची भेट घ्यायची.
पुढे मुंबईला गेल्यानंतरही मी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. पण परवानगी मिळाली नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतरच मला जाणीव झाली, की जोपर्यंत तुम्ही स्वत: जगाला तुमची दखल घ्यायला भाग पाडत नाही, तोपर्यंत साधा शिपाईदेखील तुम्हाला विचारत नाही. त्यानंतर मात्र मी मनोमन निश्चय केला, की स्वत: हून कधीच कोणापुढे हात पसरायचे नाहीत. काटकसर करून जमेल तसं शिक्षण घ्यायचं व स्वत: च स्वतःला मदत करायची. मी मुंबईला जाण्याची तयारी करू लागलो. आईने फी व खर्चासाठी जवळपास पंचवीस हजार रूपये गोळा केले होते. एवढे पैसे घेऊन मला एकट्याला पाठविणे आईला योग्य वाटलं नाही. आमच्या गावातील चंदूनानांना मुंबईची माहिती होती. आईने विनंती करून त्यांना माझ्यासोबत मुंबईपर्यंत जाण्यास सांगितलं. नाना आईला बहीण मानायचे त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. मुंबईचा प्रवास बराच लांबचा असल्यामुळे आईने सोबत काही गोडदशम्या बांधून दिल्या. बहुतेकदा असा लांबचा प्रवास रेल्वेने केला जातो; पण आम्ही बसने निघालो होतो.
रात्री पिंपळनेरला बसमधे बसलो व पुढे सटाणा, नाशिक,… i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-41
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
