अण्णाभाऊ :
(१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक.
अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम, जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.

१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.
१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच.

तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला.

मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वारण्ट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला.
त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
वर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणानं उचलला. तमाशातल्या नृत्यांगनेचे चाळ काढून टाकले आणि वीररसाच्या अंगाराचे चाळ चेतावणारा बंडखोर बंडागळी उभा केला. जुन्या कथेचा ढाचा ठेऊन नव्या युगाचा अकलेचा मोर्चा बांधला. तमाशात परंपरेने चालत आलेला गण बदलून टाकला. त्याजागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. आरंभलाच खऱ्या-खोट्याचे कोडे घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचं कुतूहल वाढवीत त्यांनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची, मांग-महार, रामोशांच्या व्यथा वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून कथा-कादंबऱ्यांतून मांडला.
अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली.
अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची काही लोकनाट्य होत.
अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे.

सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले वैजयंता (१९६१, कादंबरी: वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी: आवडी), डोंगरची मैना (१९६९, कादंबरी: माकडीचा माळ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी: चिखलातील कमळ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी: वारणेचा वाघ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी: अलगूज), फकिरा (कादंबरी: फकिरा ). या शिवाय इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.
अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती. अण्णाभाऊंच साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं.
जनमानसात प्रसिद्ध पावलं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे. तर, शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे.
अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर, तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ते म्हणत. त्यांनी लेखनाचा प्रेरणास्त्रोत सोशीत-उपेक्षितच होता.
स्रोत:(गूगल)
‘बहुजन समता पत्र’ न्यूज पोर्टल व वृत्तपत्राकडून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना कोटि कोटी वंदन.. व सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
