दिनांक २ जून,श्रीगोंदा:
कुकडी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे कालवा आवर्तन कार्यक्रम वारंवार अयशस्वी होत आहे. पाणी वितरणाचा कार्यक्रम कुकडी कालवा सल्लागार समितीच्या मिटिंग मध्ये जाहीर करतात. त्यात केवळ किती TMC पाण्यामध्ये ? किती दिवस रोटेशन करण्यात येईल,एवढेच सांगण्यात येते.त्यानंतर पाणी टेल टू हेड या नियमाच्या नावाखाली व राजकीय दबावापोटी कमी असलेल्या तालुक्यामध्ये नेण्यात येते. तालुक्यातील बहुतांश शेतकरी या आवर्तनात उपेक्षित राहत असल्यामुळे, यात नियमावली व सुसूत्रता असणे गरजेचे असल्याने, श्रीगोंदा तहसील प्रशासनास पीडित शेतकऱ्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करणार असल्या संदर्भात शेतकरी बचाव कृती समितीमार्फत निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्याला पाण्याची मागणी केली असता,देऊ पाहू, करू, पोटभर पाणी मिळेल, अशी उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात, अचानक कालवा बंद केल्या जातो, त्यामुळे बहुतांशी वितरिकानां पाणी पोहचते न पोहचते तोच पाणी बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे भरणे राहतात. शेतकऱ्यांचे पिके, फळबागा अक्षरशः नष्ट झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटात कुकडी पाटबंधारे खात्याचे निष्क्रियपणामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले असून,त्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही.असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दिनांक ६ जून पासून पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु होणार आहे. अशी खात्रीलायक बातमी समजली आहे.मात्र, नेहमीप्रमाणे यावेळी ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास तर होणार नाही ना ? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.त्यासाठी मागीलप्रमाणे आवर्तन आम्हाला मान्य नसून, आपण व आपल्या वरिष्ठांनी कुकडी कालव्याचे आवर्तन किती दिवस खालील तालुक्यात चालू राहील ? तसेच,वेळेनुसार तारिख निहाय व तालुका निहाय पाणी वितरणाचा कार्यक्रम खात्याने जाहीर करावा.संबंधित प्रशासनात नसलेल्या ताळमेळामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. मागणी केल्यानुसार वेळ व कालावधी स्पष्ट करावा व त्यानुसारच पाणी वितरण करावे. अन्यथा, श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यामध्ये पाणी आल्यावर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी बचाव कृती समितीचे सदस्य आलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज श्रीगोंद्याचे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी राजेंद्र काकडे,ऋषिकेश गायकवाड, चंद्रकांत वाजे, सूर्यजीत पवार, विजय खेतमाळीस, सतीश बोरुडे, उमेश बोरुडे, सुभाष पंदरकर, सुनील गायकवाड, विशाल गायकवाड, योगेश मेहेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नमूद आंदोलन करतेवेळी कोरणा प्रादुर्भाव लक्षात घेता, सामाजिक अंतर ठेवत हे आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी निवेदनात नमूद केले आहे.
