दिनांक १० फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील वडळी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, काल वागस्कर वस्तीवरील कॅनलच्या पेटी पुलाजवळ बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. खडी मशीन आणि वडाळी रोड परिसरात ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वडळी गावातील वडाळी रोड परिसरात असलेल्या वागस्कर वस्तीवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. कॅनलच्या पेटी पुलाजवळ असलेल्या शेळीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढला असून, पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले जात आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब डांगे यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. डांगे यांनी वनविभागाच्या अधिकारी भगत मॅडम यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि परिसरात पिंजरा लावण्याची आग्रही मागणी केली.
“आज बिबट्याने मुक्या जनावरांवर हल्ला केला आहे, उद्या तो माणसांवरही हल्ला करू शकतो. वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ पिंजरा लावावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे,” अशी भीती रावसाहेब डांगे यांनी व्यक्त केली आहे.
सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे सावट आहे. “आज शेळीवर हल्ला झाला, उद्या तो लहान मुलांवर किंवा मोठ्या माणसांवर होईल,” अशी चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

स्थानिक सरपंचांनी या प्रकरणात लक्ष घालून वनविभागावर दबाव निर्माण करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
वनविभागाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी वडळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
