दिनांक ११ जानेवारी, श्रीगोंदा
विरोधकांनी वितरित केलेल्या पुस्तकेतील माहिती दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे. या पुस्तिकेला मुद्रांक नाही, प्रकाशक नाही, प्रति संख्या किती..? हे देखील नाही. हा निवडणूक आचारसंहिता भंग असल्याने, कायदेशीर सल्ल्याने या ढोंगी लोकांवर बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल करायचे काम चालू आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देखील याची तक्रार करणार आहे.
जर हे पुस्तक छापायचेच होते. तर, मुद्रांक आणि प्रकाशाचे नाव छापायची हिम्मत यांच्यामध्ये नव्हती का? असा सवाल स.म.शि.ना. सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केला.
खोटी माहिती छापून प्रसिद्ध करण्याचा हेतू आमची बदनामी करणे हाच असून, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत असेही नागवडे म्हणाले.

या पुस्तकेत ग्राम लाईफ फार्मस प्रोड्युसर कंपनीचा उल्लेख केलेला आहे. या बद्दल त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. शासनाच्या कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे, या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करण्यात येते. शेतकऱ्यांना खते, बी/ बियाणे, कृषी साहित्य स्वस्त दरात पुरवणे, शेतमाल एकत्र करून बाजारपेठेत विकणे किंवा प्रक्रिया करणे, ही कामे या उत्पादक कंपनी मार्फत केली जातात.
नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्हीं काम करत आहोत. आज पर्यंत आम्हीं शेतकरी हिताचाच विचार केला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आहे. त्यामुळे अशा भूलथापांना सभासद बळी पडणार नाही.
कारखान्याच्या स्थापनेपासून एकदाच लोकांनी विरोधकांना सत्तेची संधी दिली. तर, त्या एक दोन वर्ष्याच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा भलामोठा पाचशे पानाचा बायस अहवाल सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीने प्रकाशित झाला होता.
हा विरोधकांचा काळाकुट्ट इतिहास सर्व जनतेला चांगला माहीत आहे. त्यामुळे ह्या छोट्या आणि खोट्या पुस्तिकेचा काहीही उपयोग होणार नाही. सभासद या पुस्तिकेला आणि छापणाऱ्यांना केराची टोपली दाखवल्या शिवाय राहणार नाही.

मुद्रक प्रकाशकाचे नाव छापण्याची हिंमत नसणाऱ्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. आमची केंव्हाही तयारी आहे. ही लुटारूंची टोळी एकत्र येऊन कारखाना लुटू पाहत आहे. जनता कधीही फसणार नाही.
आम्हीं स्व. बापूंचा वारसा समर्थपणे चालवत आहोत. सार्वजनिक जीवनात ३५ वर्षे बापूंना विरोध करणाऱ्यांना स्वतःचा प्रचार करताना बॅनर वर बापूंचा फोटो लावावा लागतो आहे. हे जनतेच्या लक्षात येते आहे.
याबाबत श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी धनसिंग भोईटे, ad सुनिल भोस सह पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
