दिनांक ३० नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा/इंदापूर:
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे एका नातेवाईकानेच तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीने भिगवण पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जण श्रीगोंदा येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या आत्याच्या मुलाने (सचिन कुमार मंचरे) तिचा हात धरून, “तू माझ्याशी लग्न कर,” असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने हातातील कोयत्याचा धाक दाखवत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी त्याच्यासोबत असलेल्या दिपक राहिंज नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या भावाला धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात सचिन कुमार मंचरे (रा. बंडगरवाडी, पोंधवडी, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि दिपक राहिंज (वय ३२, रा. राहिंजवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपाली खेत्रे करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
