दिनांक १३ सप्टेंबर २०२५,अहिल्यानगर:
पंढरपूर पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या खर्चात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अपहार, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असून जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

संभाजी ब्रिगेडने या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले असून सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना भेटून अधिकृत तक्रार व पुरावे सादर करण्यात येणार आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल व्हावेत, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर खटले चालवावेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका मांडत म्हटले आहे की, “जनतेच्या करातून जमा होणारा शासनाचा पैसा हा समाजहितासाठी वापरला जाणे अपेक्षित आहे. मात्र, तो भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल तर जनता गप्प बसणार नाही. पायी दिंडी वारी ही श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे. या पवित्रतेवर भ्रष्टाचाराचा डाग लावणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

सोमवारी जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केल्यानंतर पुढील आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली जाईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
स्रोत:(शाम जरे)

Advertise..
