दिनांक २७ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारी बारव..
“महाराष्ट्र बारव मोहिम” अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन व शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने बेलवंडी कोठार येथिल ९०० वर्षापूर्वीच्या पुरातन बारवची स्वच्छता करण्यात आली. ही ४६ वी. स्वच्छता मोहीम होती.

महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि बारव संवर्धन कार्य करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वारसा संवर्धन समितीचे सदस्य ईश्वर कोठारे यांच्या नियोजनात ही मोहिम पार पडली. यामध्ये १८ शिवदुर्ग सदस्यांनी सहभाग नोंदवला.

मागिल चार वर्षांपासून शिवदुर्ग परिवार श्रीगोंदा तालुक्यात बारव स्वच्छता अभियान राबवत आहे. पूर्वीच्या काळी जिवंत पाण्याचा स्रोत असणाऱ्या आपल्या पूर्वजांचा वारसा जतन करत आहे.

शिवदुर्ग परीवाराच्या सदस्यांनी ही बारव स्वच्छता मोहीम राबवली. बारव परिसरात वाढलेली काटेरी झुडपे तोडून बारवेच्या आतील गाळ काढायला सुरुवात केली आहे. मोठया प्रमाणात श्रमदान केले. आतील परिसर स्वच्छ केला. ही संपुर्ण बारव मोकळी केल्यानंतर ही मोहिम समाप्त होईल. अजुन काही दिवस ही मोहिम येथे सुरू राहील.

या मोहिमेत संचालक अजित दळवी, उपाध्यक्ष सचिन भोसले, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, प्रा.भरत खोमणे, प्रा.प्रणव गलांडे, ऍड.गोरख कडूस, मारूती वागसकर, अक्षय ओहोळ, जालिंदर पाडळे, सुचित्रा दळवी, निरज पाडळे, अविष्कार इंगळे, वैभवी भोसले, अर्णव बडे, शौर्य भोसले यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ईश्वर कोठारे यांच्या मातापित्यांनी मोहिमेत राबलेल्या सर्वांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

“बारव हे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले वैभव आहे”..
बेलवंडी कोठार येथे दोन बारव आहेत. दोन वेगवेगळ्या कालखंडातील दोन वेगवेगळ्या आकाराच्या, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हे संपुर्ण महाराष्ट्रातिल एकमेव ठिकाण आहे. भविष्यात हा वारसा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होवू शकतो. महाराष्ट्र बाराव मोहिम सर्व समाजाची मोहिम आहे. या मोहिमेत गावोगावच्या नागरिकांनी उत्स्फर्तपणे सहभागी व्हायला हवे.

स्रोत:(राजेश इंगळे, अध्यक्ष
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन.)
