दिनांक १९ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
राज्यातील इतर अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये महा विकास आघाडीने जागावाटपाचा तिढा सोडवला असला, तरी श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातील तिढा शनिवारी रात्रीपर्यंत कायम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाची जागा सोडण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली असली तरी, शिवसेनेने जिल्ह्यात एक जागा मिळावी यासाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. शिवसेनेला ही जागा मिळाल्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा गेल्यास, नागवडे गटातील स्थानिक नेत्यांनी देखील सौ. अनुराधा नागवडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यासाठी तालुक्यातील दिग्गजांनी २०१४ मध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही खासदार शरद पवार यांना दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने उमेदवारी न करता राहुल जगताप यांना मदत केली होती. नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांनी जगताप यांचा विजय साकारण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती, ज्यामुळे अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे नसतानाही जगताप आमदार होऊ शकले.
परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. नागवडे गटाचे वजन वाढले असून, त्यांनी आमदार नसतानाही विविध विकासकामांसाठी निधी मिळवण्याचा मोठा पाठपुरावा केला आहे. कोविड काळात नागवडे गटाने कोविड सेंटर, ग्रामपंचायतींना आर्थिक मदत आणि सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, जिल्हा सहकारी बँक यांच्यामार्फत केलेल्या कामांमुळे गटाची लोकप्रियता वाढली आहे. यामुळेच नागवडे गटातील कार्यकर्ते उमेदवारीबाबत ठाम आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून हा विषय मतदारसंघात आणि राज्याच्या पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. नागवडे गटाकडून रविवारी वांगदरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)





