दिनांक २५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते घनःशाम आण्णा शेलार आणि सांगवीचे युवा नेते ऋषिकेश भोईटे यांच्या नेतृत्वाखाली उद्या, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता निमगाव खलू येथील टोलनाक्यावर जनतेच्या भावना आणि मागण्यांचे प्रतिनिधित्व करणारे आंदोलन होणार आहे.
शेलार आणि भोईटे यांनी एकत्रितपणे हा विषय पुढे आणला असून, टोल आकारणीबाबत प्रशासनाने खुली भूमिका घ्यावी आणि जनतेच्या भावना लक्षात घेत त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे लोकांच्या मनातील अस्वस्थता आणि नाराजी प्रशासनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते शेलार यांनी सांगितले की, “टोल नाक्यांवरील अव्यवस्थितपणामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा निघावा आणि टोल आकारणीमध्ये पारदर्शकता यावी, हीच जनतेची मुख्य मागणी आहे. प्रशासनाने या मुद्यावर भूमिका स्पष्ट करावी.”
या आंदोलनादरम्यान, टोल प्रशासनाला निवेदन सादर केले जाणार आहे, ज्यामध्ये स्थानिकांच्या समस्या आणि मागण्यांचा समावेश असेल. श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लोकहिताच्या या प्रश्नावर एकत्र येऊन समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्त्रोत:(निशांत लोखंडे)




